‘भाषेला व्याकरण असते, भावनेला नाही. त्यामुळे ज्ञानग्रहणात शिस्त हवी आणि त्याच्या अभिव्यक्तीमध्ये नजाकत’ हे किंवा ‘जाताना पोचण्याची ओढ असते; येताना आठवणी रेंगाळत असतात’ अशी सुभाषितवजा वाक्यं ज्यांच्या हळुवार मनातून सहजच जन्म घेतात, अशा पेशाने अर्थतज्ज्ञ असणाऱ्या, पण वृत्तीने संवेदनशील लेखक असणाऱ्या चंद्रशेखर टिळक यांच्या तरल लेखणीचा आविष्कार म्हणजे ‘मनातलं.....मनातच!’ हे पुस्तक! टिळक यांचे अनेक पैलू आणि स्वभावगुण यांचं दर्शन घडविणाऱ्या या पुस्तकाचा हा परिचय...
.................
स्फुटलेखन ही एक कला आहे. नेमक्या आणि नेटक्या शब्दांत आपली कथावस्तू, एखादा प्रसंग किंवा एखाद्याचं शब्दचित्र मांडणं तसं कौशल्याचं काम. चंद्रशेखर टिळक हे व्यवसायाने अर्थतज्ज्ञ. त्यामुळे खरं तर व्यवसाय आणि नोकरीनिमित्ताने रुक्ष आकड्यांशी खेळणं, हे त्यांचं काम असलं, तरी त्यांनी आपल्यात दडलेला एक हळुवार आणि चोखंदळ माणूस चांगलाच जपलाय हे ‘मनातलं... मनातच!’ हे त्यांचं पुस्तक वाचताना ठळकपणे नजरेत भरतं.
त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या ‘हृदयांतरीचे हळवे हुंकार’ पानोपानी आपल्याला सतत जाणवत राहतात. ‘जनातल्या’च नव्हे तर, ‘मनातल्या’ मित्र-मैत्रिणींचंही त्यांच्याशी असलेलं नातं, त्यांच्या या छोट्या छोट्या २४ स्फुट लेखांतून अलगद उमलून बाहेर येतं. टिळकांचे त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ठाऊक असणारे कित्येक पैलू, गुण आणि स्वभावविशेष या पुस्तकाच्या ९० पानांतून आपल्यासमोर छोट्या छोट्या वाक्यांमधून डोकावत राहतात. जसं त्यांची अर्थसंकल्प विषयावरची पकड! ‘प्रिय सर’ या पहिल्याच लेखात अनामिका म्हणते, ‘स्लाइड्स, पॉवरपॉइंट, नोट्स काहीही न वापरता तुम्ही बोलत होतात’ किंवा ‘कॅम्पस रिक्रूटमेंट’ला येणाऱ्या कंपन्यांमधून कोणाची, का व कशी निवड केली पाहिजे ही धमाल उदाहरणे, किस्से, कविता, शेर, गाणी, सिनेमे सांगत स्पष्ट केले होते, सेशन संपल्यावर कित्येक मिनिटे वाजत राहिलेल्या टाळ्या मी आजही विसरले नाही.’ टिळक अत्यंत रसिक आहेत आणि हळुवार भावना बाळगणारे आहेत.
‘सत्यात मन दिले, स्वप्नात वाट पाहताना; निघालो तरीही, सारेच मागे राहताना’ असं लिहून जाणारे कविमनाचे टिळक किती संवेदनशील आहेत हे पुढच्या अनेक लेखांमधल्या वाक्यांमधून दिसून येतं. त्यांची कित्येक वाक्यं वाचताना मनातून नकळत दादही दिली जाते. उदाहरणार्थ – ‘शेखी मिरवावी असे अनेक गुण असूनसुद्धा हा तेव्हाही चंद्रासारखा शीतल होता’, ‘तेव्हा तू मला हळूच एखादं चॉकलेट द्यायचास. आठवणीने इतर कोणाला कळणारही नाही अशा बेताने. स्वतः कधीही चॉकलेट खाणारा नसतानाही..’, ‘खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका हवा आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको; पण ठळक हवी...चंद्रकोर माझा पती किती प्रेमाने साथ देतो याचे प्रतीक आणि भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्मृतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका’, ‘तिन्हीसांजेचा अंधार संकोच, बंधन, पूर्वग्रह विसरायला मदत करतो आणि त्याच वेळी धूसर प्रकाश भानावरही ठेवतो आणि काय आहे ना दिवेलागण नेहमी आधी मनात होत असते गं... पदर तर पेटला नाही पाहिजे आणि दिवा तर विझला नाही पाहिजे..’
अगदी सहज पानांमागून पानं उलटत पुस्तक कधी संपतं ते कळतही नाही; पण मग लक्षात येतं की यातली खूप वाक्यं आपल्याला आवडलीत आणि मग ती वाचण्यासाठी आपण पुन्हा एकवार पुस्तक पहिल्यापासून उघडतो... हीच चंद्रशेखर टिळक यांच्या लेखणीची कमाल!
पुस्तक : मनातलं.....मनातच!
लेखक : चंद्रशेखर टिळक
प्रकाशक : कौशिक प्रकाशन, सातारा
पृष्ठे : ९०
मूल्य : १२६ रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा).